वृत्तसंस्था: इंडोनेशियातील पश्चिम सुमात्रा येथे शीत लाव्हाचा पूर आला आहे. त्यात ५२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ३००० हून अधिक लोकांना सुरक्षा स्थळी पाठविण्यात आले आहे. या ठिकाणी अचानक आलेल्या पुरामुळे मोठा विध्वंस पाहायला मिळाला आहे. मान्सून आणि मारापी पर्वतावर थंड झालेल्या लाव्हामुळे मोठे भूस्खलन झाले आहे. शनिवारी मध्यरात्रीपूर्वीच नदीला पूर आला. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर मुसळधार पाऊस आणि ज्वालामुखीच्या उतारावरून थंड लाव्हामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे बेटावर अचानक पूर आला. या पुरात ५२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून ४५ जणांची ओळख पटली आहे, तर २४९ घरे उद्ध्वस्त झाली आहेत. कोल्ड लाव्हाच्या पुरामुळे १२ हून अधिक लोक बेपत्ता झाल्याचे समोर आलं आहे. पश्चिम सुमात्रा प्रांतातील चार जिल्ह्यांतील गावे उद्ध्वस्त झाली आहेत. यांचा स्थानिक बचावकर्ते, पोलीस आणि लष्काराकडून सातत्याने शोध सुरू आहे.