परळी वैद्यनाथ (दि. ०९): परळी वैद्यनाथ शहरात कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी आज मुस्लिम समाज बांधवांसमवेत मॅरेथॉन बैठकांचे सत्र राबवत शेकडो मुस्लिम बांधवांशी भेटून संवाद साधला.
भाजप किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून काही मुस्लिम समाज बांधवांच्या मनात शंका कुशंका पसरवल्या जात आहेत, मात्र परळीतील जनतेची सेवा करताना स्व. मुंडे साहेब, स्व. पंडित अण्णा, मी स्वतः किंवा पंकजाताई यांपैकी कोणीही कधीही जात धर्माचे राजकारण केले नाही, किंवा भविष्यातही करणार नाहीत याची खात्री सर्व परळीकरांना आहे. कोविड चे संकट असो किंवा विकासाचे कोणतेही काम असो मदत किंवा विकास करताना कधीही मध्ये जात धर्म आम्ही आणत नाही त्यामुळेच परळीतील मुस्लिम बांधवांनी प्रत्येक बूथ मधून मला लीड देत भरघोस मतांचा आशीर्वाद दिला. त्याच बळावर मी मंत्री झालो. त्यामुळे आता असाच आशीर्वाद आपल्याला आपल्या पंकजाताई साठी सुद्धा उभा करायचा आहे, असे धनंजय मुंडे या संवाद बैठकांच्या माध्यमातून म्हणाले.
प्रत्येक बूथ मधून विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाज बांधवांनी जी 'मोहब्बत' मला मतदान रुपी आशीर्वाद देऊन व अधिकचे मताधिक्य देऊन माझ्याप्रति व्यक्त केली, आता त्याहीपेक्षा जास्त, प्रत्येक बूथ वरून कमीत कमी दहा मते माझ्यापेक्षा जास्त पंकजाताईला मिळावेत, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी या संवाद बैठकी दरम्यान केले.