नाशिक: नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आता राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सोमवार दि. २८ एप्रिल रोजी नाशिक शहरात राजकीय पक्षांसह अन्य अपक्ष उमेदवारांनी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले यात निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या जय बाबाजी भक्त परिवाराने 'लढा राष्ट्र हिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा' अशा विचारातून विविध माध्यमातून घरोघरी जाऊन नाशिककरांच्या शांतीगिरी महाराजांचे देशभक्तीचे विचार पोहचवले असून 'अब की बार दस लाख पार' अशा ध्येयाने प्रेरित होऊन सर्वाधिक मतदारांपर्यंत पोहचले.
रामकुंडावर विधिवत गगापुजन करून भगवान कपालेश्वर महादेवांना नतमस्तक होऊन रॅलीस प्रारंभ करण्यात आला. या रॅलीमध्ये महिला भाविकांचाही लक्षणीय सहभाग दिसून आला. पिवळ्या साड्या परिधान करून त्या यात सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे संबळ वादक, सजवलेली बैलगाडी या रॅलीचे आकर्षण ठरले. हाती भगवे ध्वज, बॅनर वर लढा राष्ट्र हिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा, नाशिकचा आवाज शांतीगिरीजी महाराज, शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा, नोकरदारांचा आवाज, विद्यार्थ्यांचा, नारीशक्तीचा आवाज, गोरगरिबांचा, मजूरांचा आवाज शांतीगिरीजी महाराज असे फलक झळकत होते. रॅलीत नाशिक शहरातील व आश्रामीय संत, भाविक व हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
तसेच सोशल मीडियावरही नाशिक लोकसभा मतदारसंघातील चर्चेत असलेल्या उमेदवारांपैकी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यासोबत जोरदार जनमत असल्याचे दिसून येते आहे. नेटकरी सोशल मीडियावर महाराजांचा लोकसभेसाठी जोरदार प्रचारही करत असल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे भक्त परिवाराच्या वतीने काल शहरातील गोदावरी तीरावरील गौरी पटांगण येथून जोरदार शक्तिप्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मौनव्रतात भव्य रॅली काढण्यात आली होती. हजारो नागरिकांची उपस्थिती असतांनाही प्रचंड शांततेत ही रॅली संपन्न झाली. रॅली शिस्तबद्धरित्या पार पडली.