बीड: बीड लोकसभा मतदारसंघात माळी समाजाचे युवा कार्यकर्ते संतोष रासवे यांनी उमेदवारी दाखल केली होती, मात्र बीड जिल्ह्यात सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे हा एकमेव पर्याय आहे; ही बाब लक्षात घेऊन उमेदवारी अर्ज माघारी घेतला असल्याचे संतोष रासवे यांनी सांगितले. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्यासाठी जीवाचे रान करून निवडून आणू. बीड जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न साकार करणार असल्याचे संतोष रासवे यांनी सांगितले.
पुढे बोलताना संतोष रासवे म्हणाले, बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीने जातीय रंग धारण केला आहे. जिल्ह्यात दूषित वातावरण निर्माण केले जात आहे.
स्वर्गीय मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी बहुजनांचा पक्ष बनविला, खेड्या पाड्यात पोचवला. यामुळे मराठा, साळी, माळी, कोळी, हटकर, धनगर, वंजारी, मुस्लिम, दलित आदी सर्व समाजाचे लोक मुंडे साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभे राहायचे.
महाराष्ट्र पुरोगामी आहेच, आमचा बीड जिल्हा सुद्धा पुरोगामी आहे. मात्र मुंडे साहेबांचे अकाली निधन झाले व जिल्ह्यासह राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. परंतु त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांनी भाजपाची साथ सोडली नाही, तसेच बीड जिल्ह्यातील जनतेला सुद्धा एकटे सोडले नाही.
गेली दहा वर्ष प्रीतम मुंडेंच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे. केंद्रात मोदी साहेबांचे सरकार आहे. यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळत आहे. गेली अनेक वर्षापासून खितपत पडलेला रेल्वे प्रश्न बीड जिल्ह्याच्या काही अंतरावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याचे रेल्वेचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. बीड जिल्ह्यात रेल्वे आल्यास अनेक उद्योग धंदे येथील. तरुणांच्या हाताला काम मिळेल. म्हणून विकासाची क्षमता असलेला वजनदार खासदार दिल्लीत जाणे आवश्यकच आहे. म्हणून सर्वांनी एकत्रितपणे पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन रासवे यांनी केले आहे.