ठाणे: शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे या नेहमी साधू संतांचा अवमान करीत असतात. त्याविरोधात ठाणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. शनिवारी वारकरी संप्रदायाने अंधारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे.
मध्यंतरी सुषमा अंधारे यांनी साधू संतांच्या विरोधात बेताल वक्तव्य केली होती. यासाठी वारकरी संप्रदायाने ठाणे बंदची हाक सुद्धा दिली होती. आता पून्हा निवडणुकीच्या धामधुमीत सुषमा अंधारे यांनी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जगद्गुरु व समस्त वारकरी संप्रदायांचे श्रद्धास्थान असलेले संत तुकाराम महाराज यांचा अवमान केला होता. त्या विरोधात ठाणे जिल्हा वारकरी संघटनेने अंधारे यांचा निषेध व्यक्त करत त्या ज्या पक्षामध्ये असतील त्या पक्षाला मतदान न करण्याचा वारकऱ्यांनी एकमताने निर्णय घेतला आहे. यावेळी शेकडोच्या संख्येने वारकरी संप्रदायातील महिला - पुरुष उपस्थित होते.