मुंबई: खऱ्या - खोट्या शिवसेनेबद्दल बोलायचे झाल्यास, मी एवढेच सांगेन, की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत. आम्ही बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने चाललेलो आहोत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे ज्या गोष्टी बाळासाहेबांना मान्य नव्हत्या, नेमक्या त्याच गोष्टी करत आहेत. त्यांना सावरकर नको, तर औरंगजेब हवा आहे. त्यांची विचारधारा बदलली आहे. लोक मतदान करताना या गोष्टीचा नक्कीच विचार करतील, असे प्रतिपादन करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा सेनेवर टीका केली.
शिवसेना पक्ष फुटल्यापासून दोन्ही गट सातत्याने एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत आहेत. तसेच आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा करत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, आमचा पक्ष हीच खरी शिवसेना आहे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालत आहोत. आम्ही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. उद्धव ठाकरे व त्यांच्या गटाने बाळासाहेबांच्या विचारांना डावलून औरंगजेबाचे विचार जवळ केले असल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.